फुले एज्युकेशन व सोमनाथ राऊत तर्फे सांगोला , घेरडी येथे जयराम गोरे आणि पुजा आदलिंगे यांचा 51 वा.सत्यशोधक विवाह सोहळा होणार !!!
आटपाडी kd24news :सांगोला फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन पुणे चे बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे आणि सोमनाथ राऊत, कार्याध्यक्ष महाराष्ट्र माळी समाज महासंघ यांचे प्रयत्नामुळे रविवार दि.23 फेब्रुवारी 2025 रोजी दु.3.30 वाजता सांगोला ,घेरडी (स्वगृही) येथे जेष्ठ समाजसेवक व प्रगतशील शेतकरी शिवाजीराव गोरे यांचा सत्यशोधक जयराम गोरे,B.SC.Agri आणि समाजसेवक उद्दव आदलिंगे यांची सत्यशोधिका पुजा आदलिंगे, HSC यांचा महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न होणार आहे.
या सोहळ्याचे विधिकर्ते म्हणून संस्थेचे अध्यक्ष व महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समितीचे निमंत्रित सदस्य सत्यशोधक रघुनाथ ढोक हे नेहमी प्रमाणे महात्मा फुले यांच्या वेशभूषेत विधी कार्य पाडणार आहेत यावेळी वधू वर याना सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि थोर समाज सुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची फोटो फ्रेम भेट दिली जाणार आहे. यावेळी वधू वर यांचे आई वडील व मामा मामी यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वतीने सन्मान पत्र येण्यात येणार आहे.तर महात्मा फुले रचित मंगलाष्टकाचे गायन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विश्वस्त प्रा. सुदाम धाडगे करणार आहेत.
या सत्यशोधक विवाह सोहळ्यासाठी राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज्य मंत्री व सोलापूरचे पालक मंत्री मा.ना.जयकुमार गोरे ,सांगोलाचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख ,माजी आम.अॅड.शहाजी बापू पाटील ,सोलापूरचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील ,रासप चे प्रदेश उपाध्यक्ष सोमा मोटे, डॉ.गणपतरावजी देशमुख सुत गिरणी चे चेअरमन डॉ.प्रभाकर माळी तसेच सातारा माळी महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब ननावरे उपस्थितीत रहाणार असल्याचे या सत्यशोधक सोहळ्याचे स्वागतोस्तुक महाराष्ट्र राज्य माळी समाज महासंघाचे कार्याध्यक्ष सोमनाथ राऊत यांनी माहिती दिली आहे.
सोमनाथ राऊत यांच्या प्रयत्नाने या परिसरात प्रथमच सत्यशोधक विवाह सोहळा होत असून या पूर्वी शिवाजी गोरे यांनी आपल्या श्रीराम बंगल्याची वास्तू पूजन व गृहप्रवेश सोहळा याच फुले एज्युकेशन तर्फे दि.१९ मे २०२४ रोजी अंधश्रद्धा कर्मकांड याला तिलांजली देत संपन्न केला आणि आता जयराम व पुजाचा सत्यशोधक विवाह आम्ही फुले दाम्प्त्यांचे विचार वसा पुढे नेऊन प्रसार करीत करणार असल्याचे देखील शिवाजी गोरे व सोमनाथ राऊत म्हणाले आहेत.